भा. रा. तांबे यांची समग्र कविता | Bha. Ra. Tambe Yanchi Samagra Kavita | Marathi Book Review

भा-रा-तांबे-यांची-समग्र-कविता-Bha-Ra-Tambe-Yanchi-Samagra-Kavita-Marathi-Book-Review
पुस्तक भा. रा. तांबे यांची समग्र कविता कवी भा. रा. तांबे
प्रकाशन व्हीनस प्रकाशन समीक्षण अक्षय सतीश गुधाटे
पृष्ठसंख्या ३३० मूल्यांकन ४.७ | ५

भा. रा. तांबे म्हटलं की तुमच्या डोळ्यांसमोर काय येते? माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागतात या कवितांच्या ओळी... "पिवळे तांबूस ऊन कोवळे.. या बालांनो या रे या..", आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवणाऱ्यास साथ देईल असं तत्त्वज्ञान "मावळत्या दिनकरा.. जन पळभर म्हणतील 'हाय हाय'.." या कविता आणि चित्त एकाग्र होतं ते या शब्दांच्या साधेपणात. जेव्हा हे पुस्तक मला दिसले तेव्हा अनेक दिवसांची सुप्त इच्छा पूर्ण झाल्याची भावना मनात होती. भारांच्या अनेक कवितांना आपण भारावून गेलेलो आहोतच. परंतू त्यांच्या सर्वच कविता एकत्र वाचायला मिळणार याचा आनंद मोठा होता. पुस्तक घेतलं आणि दोन दिवसात दोन वेळा वाचलं. अनेक कवितांची पारायणं झाली.

तांबे यांच्या कविता क्रमानेच वाचायला हव्यात. त्यात समकालीन घटनांचे प्रभाव आहेत. अगदी साधी भाषा. ती भाषा १८९० ते १९२० च्या काळातील बहुतांश असल्या कारणाने त्यात प्रामुख्याने संस्कृत प्रभावची झलक आहे. कविता इतक्या सहज आहेत की वाचताना प्रत्येक कवितेची भावना मनाला भिडते. तांबे यांनी लिहिलेल्या कवितांचे प्रकार वाचून थक्क व्हायला होतं. लावणीपासून ओवीपर्यंत.. जन्मापासून मृत्यूपर्यंत.. प्रेमापसून प्रणयापर्यंत.. त्यांनी स्वतःचे विचार कालानुरूप सशक्त मांडले आहेत. त्यांच्या अनेक काविता स्त्रियांच्या मनाचा ठाव घेतात.. लहान मुलांच्या भावविश्वाचा उलगडा करतात. अनेक इंग्रजी साहित्यातील मानदंड ठरलेल्या कविता त्यांनी मराठी भाषेत अनुवादित केल्या. पुंगीवाला ही कविता त्याचे उत्तम उदाहरण आहे.

तांबे यांच्या कवितांच शब्दसमार्थ्य जब्बरदस्त आहे. लहापणापासूनच कविताची आवड आणि प्रतिभा त्यांना लाभली होती. तांबे बहुभाशी होते; त्यांना मराठी सोबतच संस्कृत, उर्दू, बंगाली, इंग्रजी आणि हिंदी याही भाषा अवगत होत्या. त्यांच्या कविता सजीव आहेत.. त्यातून निसर्गाचे वर्णन अगदी मुक्तहस्ताने केले आहे. त्यांच्या कवितेला ताल, लय, शब्द, पोत, अर्थ व भावनांचे चित्रीकरण तर आहे, त्या सोबतच सहज गेयता प्राप्त झालेली असते. भा.रा. यांनी त्यांच्या कारकिर्दीत संस्थानात अनेक पद भूषवली. त्यात शिक्षण क्षेत्रातील त्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. याच काळात त्यांनी लहान मुलांसाठी अनेक सुंदर कविता लिहिल्या.

त्यांच्या मला आवडलेल्या अनेक कविता खालीलप्रमाणे आहेत, त्यातली एक एक कविता एक वेगळा अनुभव आहे. "कुस्करू नका ही सुमने, झरा, डोळे हे जुलमि गडे, पुंगीवाला, गुराख्याचे गाणे, वदन मदनरंगसदन, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, प्रीतीचा वास, हा आणि तो, कुपित अंगनेप्रत, क्रुद्ध सुंदरीस, राजकन्या आणि तीची दासी, हे कोण गे आई, रासमंडळ गोपीचंदन, आईकडे न्या, तर मग गट्टी कोणाशी, रुद्रास आवाहन, शिशुवंचन, जीवसंयोग, लोकमान्यास, भयचकित रमावे तुज रमणी, ते दूध तुझ्या त्या घटांतले, नववधू प्रिया मी, घन तमी शुक्र बघ राज्य करी, घातली एकदा आता उडी, पोषाख नवनवा मला दिला, घाबरू नको बावरू नको, आलो थांबाव शिंग, जन पळभर म्हणतील 'हाय हाय', जन म्हणती सावळी, दृष्ट हिला लागली, ते कांत यापुढे, सहज तुझी हालचाल, भोग कुणा सुटले, रिकामे मधुघट, हांक, वधूवरयो शुभं भवतू, अहो धन्वंतरी, स्फुट ओव्या, माझ्या अंगणात, मावळत्या सूर्याप्रत, ग्रीष्म".

या कविता तुम्हाला माहित असतीलच आणि नसतील तर तुम्ही त्या शोधून वाचालच याची मला खात्री आहेच. कवितांची आवड असणाऱ्या वाचकाने हे पुस्तक वाचायलाच हवे. तुमची भारांची आवडती कविता कोणती ही आम्हाला नक्की सांगा. आता सांगा, तुम्ही "भारांनी भारावलेले" आहात का?

-© अक्षय सतीश गुधाटे.

Previous Post Next Post

Contact Form