पुस्तक | रिबेल सुलतान्स | लेखक | मनु पिल्लई | तृप्ती कुलकर्णी |
---|---|---|---|
प्रकाशन | एका पब्लिकेशन | समीक्षण | गिरीश अर्जुन खराबे |
पृष्ठसंख्या | २९३ | मूल्यांकन | ४.९ | ५ |
ज्या मातीत आपण वाढलो त्या मातीच्या इतिहासाबद्दल एक आपसुक ओढ प्रत्येकाच्या मनात असतेच. त्यातून दख्खन सारख्या इतिहासाने ओतप्रेत भरलेल्या मातीची जर बाब असेल तर मग काही सांगायलाच नको. अगदी बाराव्या शतकापासून ही भूमी अनेकांना आकर्षित करत आली आहे. त्या आकर्षणातून अनेकांनी ती आपली कर्मभूमी बनवत अनेक उच्च पद भूषवली, इथल्या मातीवर, लोकांवर राज्य केलं. त्याच सुलतानांचा उगम, ऱ्हास व त्यांच्या वंशावळीने उपभोगलेलं राज्य यांची सविस्तर माहिती आपण या पुस्तकातून वाचू शकतो.
जगाच्या पाठीवर आपला डंका गाजवणारं विजयनगर साम्राज्य असेल किंवा इथेच उगम पावलेलं बहामनी, मुघल, मराठा साम्राज्य असेल; या सगळ्यांची तपशीलवार माहिती आपल्याला इथे वाचायला मिळते. पर्शियन संस्कृतीचा इथल्या राजांवर असलेला प्रभाव, इथल्या स्थापत्यशैलीचा झालेला विकास... नौरसपूर, विजयनगर, हैदराबाद, विजापूर सारख्या नगरांची झालेली निर्मिती... बहामनींचे झालेले तुकडे, त्यातून उदयाला आलेल्या सल्तनती... हिंदू राजवटींचा झालेला ऱ्हास नी नव्याने झालेली भरभराट... सल्तनतींच्या वारसाहक्कासाठी झालेला रक्तपात... मलिक अंबर, रामराया, कृष्णदेवराय, अली आदिलशाह, गोवळकोंड्याचा कुतुबशाह, मुघल बादशाह इत्यादी शासकांनी गाजवलेला कार्यकाळ... ह्या सगळ्याची माहिती आपण या पुस्तकात वाचू शकतो. दख्खनेत जसा एक गुलाम अत्युच्च पदापर्यंत पोहोचल्याच पहायला मिळतं तसंच बहामनींचा शेवटचा सुलतान ही भूमी सोडून पळून गेल्याचही पहायला मिळतं.
अतिशय संपन्न अशा या भूमीबद्दल अनेक नवनवीन गोष्टी आपल्याला माहित होतात. इथली धन संपन्नता, शूरता व राजकीय सत्तांतरांच्या कथा आपल्याला अचंबित करून सोडतात. फारुख बेग, फ्रॉईस, विल्यम मेथवल्ड, गार्सिया दा ओर्ता, फर्नाओ नुनीझ अशा एक ना अनेक प्रवाशांच्या, चित्रकारांच्या अस्सल नोंदी आपल्याला इथे वाचायला मिळतात. एकूण सात प्रकरणातून मनु एस पिल्लई आपल्याला १२०६ ते १७०७ पर्यंतचा काळ फिरवून आणतात. कितीतरी गोष्टी जाणून घेण्यासारख्या, अभिमानाने मिरवण्यासारख्या या दख्खनेत घडल्या आणि काळाच्या ओघात नष्टही झाल्या. मात्र चारमिनार, गोल घुमट, गोवळकोंडा किल्ला, हंपी (विजयनगर साम्राज्य), चांदबीबीचा महाल, बीदर मदरसा यांसारख्या वास्तू आजही त्या सगळ्यांची साक्ष घेऊन उभ्या आहेत.
इतिहासाची ओढ असणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे एक मेजवानीच आहे. ओळीगणिक समोर चित्र उभं करण्याची ताकद या लेखनात आहे. तुम्हीही जर अशा एखाद्या पुस्तकाच्या शोधात असाल तर तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचू शकता. एका रक्तरंजित राजेशाहीचा परंतु तरीही संपन्न असणारा काळ तुम्ही जाणून घेऊ शकता. ग्रंथालयामधून माझ्या हाती आलेलं हे पुस्तक आता घरच्या ग्रंथालयाचं कायमस्वरूपी सदस्य झालं आहे; कारण पिढ्यानपिढ्या ते वाचलं गेलं पाहिजे. या पुस्तकात अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत, नोंदी आहेत; कसल्याही भाकड कथा वा अफवांना त्यात थारा नाही. त्यामुळे तुम्हीही याचा आनंद घ्या आणि तुमचं मत आम्हाला कळवा.