पत्री - साने गुरुजी | Patri - Sane Guruji | Marathi Book Review

पत्री-साने-गुरुजी-Patri-Sane-Guruji-Marathi-Book-Review
पुस्तक पत्री कवी साने गुरुजी
प्रकाशन रिया पब्लिकेशन्स समीक्षण गुरुदत्त वाकदेकर
पृष्ठसंख्या ३२८ मूल्यांकन ४.५ | ५

पत्री” हा साने गुरुजींचा पहिला कवितासंग्रह असून त्यांच्या भावविश्वाचा, राष्ट्रप्रेमाचा आणि माणुसकीच्या मूल्यांचा ठेवा आहे. तुरुंगवासाच्या काळात आत्मसंवादातून साकारलेल्या या कविता म्हणजे त्यांचे अंतःकरण, चिंतन आणि तत्त्वविवेक यांचे कविमनोगत होय. या रचनांमध्ये करुणा, भक्तिभाव, सामाजिक संवेदना आणि देशभक्ती यांचा एक भावस्पर्शी संगम दिसून येतो. पांडुरंग सदाशिव साने, म्हणजेच साने गुरुजी (१८९९–१९५०), हे थोर साहित्यिक, आदर्श शिक्षक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या लेखणीतून नेहमीच माणुसकी, समता, बंधुभाव आणि सेवाभाव प्रकट होत असे. श्यामची आई, आपण सारे भाऊ, समाजवाद, सत्यनिष्ठ शिक्षक यांसारख्या ग्रंथांनी त्यांनी समष्टीचे भान आणि सद्भावना जनमानसात रुजवली.

‘पत्री’ या संग्रहात एकूण १६२ कविता असून त्या विविध विषयांवर आधारित आहेत. त्यांचे प्रमुख तीन प्रवाह पुढीलप्रमाणे:

१. धार्मिक आणि आध्यात्मिक कविता - उदा. “माझी बुडत आज होडी”, “मजला तुझ्याविण जगी नाही कोणी”, “मम जीवन हरिमय होऊ दे” – या कविता भक्तिभाव, आत्मशुद्धी आणि ईश्वरप्रेमाने ओतप्रोत आहेत.

२. सामाजिक जाणीव जागवणाऱ्या कविता - “श्रमाची महती”, “मजूर”, “दुःख मला जे मला ठावे” यांमधून त्यांनी श्रमिकांचे दुःख, उपेक्षा, वंचितांचे जीवन आणि समाजातील विषमता यांचे हृदयस्पर्शी चित्र उभे केले आहे.

३. देशभक्तिपर कविता - “बलसागर भारत होवो”, “स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई”, “भारतमाता माझी लावण्याची खान” या कवितांतून त्यांच्या देशभक्तीची, लढ्याची आणि आत्मत्यागाची भावना उत्कटपणे प्रकट होते. काही कविता इतक्या प्रभावी होत्या की ब्रिटीश सरकारने त्या जप्त केल्या.

साने गुरुजींची भाषा अत्यंत साधी, प्रवाही आणि भावनांना भिडणारी आहे. त्यांनी वापरलेले शब्द हे जसे सर्वसामान्यांना समजतील असे आहेत, तसेच ते अंतःकरणाशी नाते जोडणारेही आहेत. उपमा, प्रतीके, अनुप्रास यांचा त्यांनी अतिरेक न करता प्रभावी वापर केला आहे. कविता रसग्रहणासाठी जितकी सुंदर आहेत, तितकीच त्या वैचारिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी आहेत. “पत्री” हा केवळ कवितासंग्रह नाही, तर तो एका क्रांतिकारी मनाच्या भावदर्शनाचे माध्यम आहे. साने गुरुजींनी आपल्या कवितांमधून सामाजिक विषमता, अस्पृश्यता, अन्याय आणि अन्य सामाजिक प्रश्नांना भिडवले आहे. त्यांच्या कवितांमधून कृतीला प्रेरणा देणारी सत्वशक्ती अनुभवायला मिळते.

“पत्री” हा कवितासंग्रह म्हणजे साने गुरुजींच्या जीवनदृष्टीचा, राष्ट्रनिष्ठ भावनांचा आणि मानवतावादी विचारांचा झरा आहे. त्यांच्या कवितांनी केवळ एका काळातच नव्हे, तर अनेक पिढ्यांमध्ये देशप्रेम, नीतिमूल्ये आणि करुणा यांचे बीज पेरले. आजच्या काळातही “पत्री” वाचन म्हणजे मूल्याधिष्ठित, भावस्पर्शी आणि प्रेरणादायी साहित्यप्रवासाचे दर्शन आहे.

-© गुरुदत्त वाकदेकर.

Previous Post Next Post

Contact Form