पुस्तक | दीवार में एक खिड़की रहती थी | लेखक | विनोद कुमार शुक्ल |
---|---|---|---|
प्रकाशन | हिन्द युग्म | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | २४८ | मूल्यांकन | ५ | ५ |
मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात, स्वतःची.. हक्काची.. एक स्वप्नांची दुनिया असते. त्या दुनियेत कोणी खलनायक नसतो.. असतात फक्त साधेपणाने जगणाऱ्या माणसांच्या गरजा, इच्छा किंवा कमी-जास्त प्रमाणात आसपासच्या परिस्थितीत वावरणाऱ्या काही पात्रांच्या आयुष्याचा प्रभाव. तसाच प्रभाव आपल्यावर देखील होत असतो, आपण वाचणाऱ्या पुस्तकांचा.. अश्यातच एक पुस्तक हातात पडलं.. अतिशय सुबक सुंदर मुखपृष्ठ.. रात्रीच्या शांत वातावरणात, आकाशात चंद्र, एकटी सायकल.. व हत्तीच्या पाठीवर दोन प्रवासी.. त्याच्या अंगावरच्या झालीवरच्या खिडकीतून एक सकाळ बाहेर येऊ पाहत आहे. ते चित्र पाहून तुम्ही पुस्तकाला मनात आधीच घर करून दिलेले असते. मग मात्र तेही तुमच्याकडे कायमचे वास्तव्याला येते.
पुस्तकाच्या मध्यवर्ती भूमिकेत एक मध्यमवर्गीय ग्रामीण कुटुंबातील नवविवाहित दांपत्य आहे.. गणिताचा शिक्षक रघुवर प्रसाद, बायको सोनसी व गावी राहणारा त्यांचा छोटासा परिवार. शाळेत जाण्यासाठी सायकल.. टेम्पो.. व एक नवीनच विकल्प म्हणजे हत्ती! इथून सुरू होते खरी गोष्ट.. त्या मुक प्राण्यामुळे गोष्टीला मिळालेलं वळण विलक्षण आहे. परंतु त्याहूनही अधिक महत्त्वाची.. अधिक रंजक.. अधिक दुर्मिळ म्हणजे त्यांच्या घराला असणारी एक स्वप्नसुंदर खिडकी! वास्तवाच्या चौकटी मोडून, स्वप्नाच्या जगात सदेह घेऊन जाणारी एक खिडकी.. तिथलं जीवन अवर्णनीय आहे. हाच पुस्तकाचा सारांश आहे.
तुम्ही म्हणाल.. आता सारांश माहित झाला आहेच तर पुस्तक वाचावं का? तर मी म्हणेल.. एकदा वाचून तर पहा.. हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला हरवलेला वैविध्यतेचा, नाविन्याचा, स्वप्नरंगी लोलक मिळेल.. तुम्ही आधीसारखे राहणार नाहीत. तुम्ही हरवून जाल.. कोणत्या जगात आपण आहोत याची देखील विस्मृती होईल. पुस्तक खाली ठेऊ वाटणार नाही.. लवकर संपवाव असंही वाटणार नाही. यात वापरली गेलेली हिंदी भाषा, चक्क तुम्हाला वेड लावते. रोजच्या व्यवहारातील असली तरी तिचा लहेजा वेगळा आहे. लेखकाचं भाषेवरील प्रभुत्व त्यातून अधोरेखित होईल. यातील फक्त संवादाचे प्रकार वाचून तुम्ही थक्क व्हाल.. मी तरी आजुन पर्यंत अश्या प्रकारचे संवाद वाचले नव्हते. त्याचे प्रकार मी खाली नमूद करत आहे. नायकाचा स्वतःशी संवाद.. नायकाचा इतरांशी संवाद.. नायक नायिका यांचा एकांतातील न बोलता होणारा संवाद.. तर काही संवाद असे आहेत, ज्यात सांगणारा व ऐकणारा.. बोलतात वेगळंच आणि ऐकतात व समजतात वेगळंच. ही संवादाची शैली अतिशय लोभस आहे, विशेष उल्लेखनीय आहे. पुस्तकातील प्रेमसंबंध, श्रृंगार, नाजूक घटना इतक्या सहज.. इतक्या उत्कट.. आणि तरीही त्यात उत्तेजकतेचा किंचितही लवलेशही नाही हे विशेष. त्यांच्या लिखाणाला असणारी गेयता, वाचकाला एक विलक्षण धुंदीचा अनुभव देते.. तुम्हाला जणू गुंगीच चढते.
हिंदीच काय, सर्वच भाषेतील वाचकांनी, "साहित्य अकादमी" पुरस्कार प्राप्त हे पुस्तक जरूर वाचावे. याशिवाय तुमचे वाचन अर्धवटच आहे असे मला वाटते. हे पुस्तक.. हा लेखक.. आता माझ्यासाठी काही खास आहेत. मी लवकरच "विनोद कुमार शुक्ल" यांचं उर्वरीत साहित्य देखील वाचेन! तुम्ही वाचलं आहे का हे पुस्तक? आणि नसेल तर वाट कशाची बघताय? लगेच पुस्तक विकत घ्या.. वाचा.. आणि तुमचा मौल्यवान अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.