रामाच्या पावलांवर पाऊल - निलेश कुलकर्णी, विक्रांत पांडे | Ramachya Pavlanvar Paul - Neelesh Kulkarni, Vikrant Pande | Marathi Book Review

रामाच्या-पावलांवर-पाऊल-निलेश-कुलकर्णी-विक्रांत-पांडे-Ramachya-Pavlanvar-Paul-Neelesh-Kulkarni-Vikrant-Pande-Marathi-Book-Review
पुस्तक रामाच्या पावलांवर पाऊल लेखक निलेश कुलकर्णी, विक्रांत पांडे | सुचिता फडके
प्रकाशन रोहन प्रकाशन समीक्षण गिरीश अर्जुन खराबे
पृष्ठसंख्या २१९ मूल्यांकन ४.७ | ५

भारतभूमी मध्ये जन्मलेल्या प्रत्येकाने रामाबद्दल, रामायणाबद्दल ऐकलं असेलंच. रामाबद्दल माहित नाही असा मनुष्य या देशात सापडणं तसं कठीणच. आपल्या पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून १४ वर्षे वनवास भोगणारा हा युगपुरुष! त्या वनवासाच्या काळात त्याने उपभोगलेली अनेक संकटे, अनेकांचा केलेला उद्धार आणि मुळात प्रभुरामाने केलेला अयोध्या ते लंका हा प्रवास मुळतःच उल्लेखनीय आहे. याच प्रवासाचा आधार घेऊन "रामाच्या पावलांवर पाऊल" हे पुस्तक निलेश कुलकर्णी आणि विक्रांत पांडे यांनी लिहले आहे व सुचिता नांदापूरकर - फडके यांनी ते अनुवादित केले आहे. या दोन लेखकांनी मिळून राम, लक्ष्मण, सीता वनवासाच्या काळात जिथे जिथे गेले त्या सगळ्या जागांना भेट देत हे पुस्तक साकारलं आहे. वाल्मिकी रामायण, तुलसीदास रामायण, एकनाथी रामायण अशा अनेक आवृत्त्यांमध्ये अनेक कथा गुंफलेल्या आहेत. स्थळ काळानुसार त्यात बदल करण्यात आले आहेत. नेमक्या ह्याच गोष्टी स्थानिक लोकांकडून माहिती करून घेण्यासाठी व रामाच्या प्रवासाचा दीर्घ अभ्यास करण्यासाठी लेखकांनी केलेला हा प्रवासाचा अट्टहास आपल्यालाही सगळ्या ठिकाणी फिरवून आणतो.

जागोजागी आलेले अनेक चांगले वाईट अनुभव, श्रद्धेच्या नावाखाली चाललेली फसवणूक, राम या फक्त नावावर लोकांचं असलेलं प्रेम अशा अनेक गोष्टी आपल्याला या प्रवासवर्णनात वाचायला मिळतात.  शबरी, शूर्पणखा, हनुमान, सुग्रीव या पात्रांबद्दलच्या अनेक कथा विस्तृतपणे यात आपल्याला वाचायला मिळतात. अयोध्येत आलेले अनुभव, नाशिकमध्ये आलेले अनुभव तसेच दक्षिण भारतात आलेले अनुभव यांची माहिती वाचल्यानंतर आपल्या ज्ञानात भर पडल्याशिवाय राहत नाही. रामायणातल्या माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा या प्रवासात लेखकांना झाला आहे. रामाने उभारलेल्या प्रत्येक मंदिराला भेट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकांनी केला आहे, त्यामुळे माहित नसलेल्या अनेक गोष्टी नव्याने प्रकाशात आल्या आहेत.

सीमापार, सीतेच्या शोधात, युद्ध आणि परतीचा प्रवास अशा एकूण चार प्रकरणातून या संपूर्ण प्रवासाचा वेध या पुस्तकातून घेतला गेला आहे. श्रीलंकेमधल्या वास्तु, स्थळे आणि रावणाबद्दलच्या भावना यांवर देखील प्रकाश टाकण्यात आला आहे. एका अविचारी कृत्याने एका चांगल्या माणसाचा आणि राज्याचा नाश झाल्याची भावना अखंड लंकाभर लेखकांना अनुभवायला मिळाली. रोहन प्रकाशनाच्या पुढाकाराने हे अनुवादित पुस्तक उपलब्ध झाल्यामुळे मराठी वाचकांसाठी हा प्रवास जाणून घेणं सोयीच झालं आहे. पुस्तकाच्या शेवटी प्रेमानंद महाराज म्हणतात तसं “या प्रवासात तुम्हाला काय सापडेल ते माहीत नाही मात्र तो पूर्ण झाल्यावर तुमच्यात बदल झालेला असेल”. आणि अशीच काहीतरी बदलल्याची, ज्ञानात भर पडल्याची जाणीव वाचकांनाही होते यातच या पुस्तकाच श्रेय अधोरेखित होतंय, असं मला वाटतं.

पुस्तकाची बांधणी, भाषा, मुखपृष्ठ हे सगळंच खूप बोलकं आहे. लेखकांची मेहनत वाचकांना एक सुखकर अनुभूती देते. म्हणून तुम्ही जर हा अभिप्राय इथवर वाचला असेल तर तुम्हाला हे पुस्तक नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे. त्यामुळे आजच ते तुम्ही विकत घ्या आणि तुमची मते आम्हाला कळवा.

-© गिरीश अर्जुन खराबे.

Previous Post Next Post

Contact Form